नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गुढीपाडव्याला फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिले. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता निधी वितरण व्हायला सुरूवात झाली आहे. .राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली. राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम २१६९ कोटी लाभ आधार आणि डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात ३१ मार्च २०२५ पूर्वी जमा करण्यात येत आहे
, अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६००० रूपये त्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात २०२३-२४ पासून राबवण्यात येत आहे. या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रती वर्ष प्रती शेतकरी ६ हजार रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र सरकार आणखी ६ हजार रुपयांची भर घालते. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये प्रतिवर्षी मिळतात.