नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना/वीज दर सवलत योजनेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. शासनाकडून एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत ही योजना सुरु ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहेत.त्यामुळे राज्यातील लाखो कृषी पंप शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य सरकारकडून महावितरणला एकाच दिवशी दोन मोठे निधी वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या मोफत वीज योजनेसाठी २ हजार ०२६ कोटी आणि बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत १ हजार ८०० रुपये कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
राज्यातील ७.५ एचपी कृषी पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यात येते. अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांकडून ही योजना सरकारकडून गुंडाळण्यात आल्याचा आरोप होत होता, दरम्यान, सरकारने लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र शासन उद्योग, ऊजा,कामगार व खनिकर्म विभागाने प्रसिद्ध केलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे की, कृषिपंप शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना/वीज दर सवलतीसाठी योजनेकरिता सन २०२४-२५ मधील मार्च, २०२५ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे तरतूद करण्यात आलेली रु.1800,00,00,000/- (एक हजार आठशे कोटी रुपये फक्त) रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला रोखीने वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
तसेच यापुढे देखील राज्यातील 7.5 एचपी कृषिपंप ग्राहकांना पाच वर्षांसाठी मार्च २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत मोफत वीज देण्यात येणार असून त्यासाठी प्रतिवर्षी लागणारा निधी अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस अदा करण्यात येणार असल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेली रक्कम ही फक्त कृषीपंप ग्राहकांना मंत्री बळीराजा मोफत वीज योजना / वीज दर सवलतीपोटीच खर्च होईल याची दक्षता ऊर्जा कार्यासन आणि महावितरण कंपनीने घ्यावी, तसेच ज्या उद्देशासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याच उद्देशासाठी तो उपयोगात आणला जाईल याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहील, असेदेखील जीआरमध्ये स्पष्ट म्हटले आहे.